चंद्रपूर शहरालगत वाहणाऱ्या इरई नदीच्या चुकीच्या पूररेषेमुळे नदी काठावरील व आसपासच्या परिसरातील अनेक घरे पुरामुळे बाधित होऊन नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब उघडकीस आली आहे, या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदी पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण करून पुररेषा निश्चित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नव्याने सर्वेक्षण करून पूररेषा निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.
चंद्रपूर शहरालगत वाहणारी इरई नदी मुळे 2013 च्या महापुरात अनेक घरे बाधित झाली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने 2014 मध्ये सर्वेक्षण करून आयआयटी मुंबईमार्फत 2016 मध्ये अहवाल सादर केला होता. या अहवालास 2017 मध्ये मान्यता देण्यात आली.

डायरेक्टर जनरल मेरी, नाशिक यांच्या 16 नोव्हेंबर 2015 च्या परिपत्रकानुसार घनदाट लोकवस्तीच्या भागात काटछेदाचे अंतर 100 मीटर असणे बंधनकारक आहे. त्याकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्याने ही पूररेषा निश्चिती चुकीची ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने पूर रेषा निश्चित झाल्यास शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आर्थिक नुकसानीपासून बचावासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.



