चंद्रपूर शहरातील अनियंत्रित जडवाहतूक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत प्रशासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विसकलमी सभागृहात झालेल्या बैठकीत चंद्रपूर शहरातून होणारी अवजड (जड) वाहतूक दिवसा (सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत) त्वरित बंद करण्याची आणि रस्ते दुरवस्था, नवीन बायपास तयार करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासनाकडे पाठवा तसेच वाहतूक सुरक्षेशी संबंधित सर्व समस्यांवर आठ दिवसांच्या आत उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.
निवासी जिल्हाधिकारी कुंभार, महानगर पालिका आयुक्त गायकवाड, तहसीलदार पवार, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पायघन, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता बोबडे, शहर अभियंता रवींद्र हजारे, वाहतूक पोलीस निरीक्षक पाटील, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कुंदाताई जेणेकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष एहतेशाम अली, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक नेते प्रशांत भारती, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, राहुल तायडे यांची उपस्थिती होती.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर शहरातून होणारी अनियंत्रित जड वाहतूक ही आजघडीला सर्वात मोठी समस्या बनली आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था (विशेषतः चंद्रपूर-घुग्घुस, चंद्रपूर-बल्लारपूर व चंद्रपूर-वरोरा या मार्गावर), पर्यावरणाचे प्रदूषण आणि अपघातांची वाढलेली शक्यता यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. चंद्रपूर शहरात सकाळी १० ते रात्री १० या वेळेतही जड वाहने धावत असतात, जे अपेक्षित नियमांचे उल्लंघन आहे. आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे ओव्हरलोड वाहनांवर प्रभावी कारवाई होत नाहीये, तसेच ट्रॅव्हल्स धारक आणि ताडाळी परिसरातील रस्त्यावर उभी असलेली जड वाहने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत आहेत.
या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ खालील मागण्या पूर्ण करण्याची सूचना केल्या आहे. यामध्ये शहरातील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स उभे राहतात. त्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, शहरातील महानगर पालिका क्षेत्रातील ट्रक टर्मिनस जागेवर बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या आहे, चंद्रपूर-मुल मार्गावर शाळा-महाविद्यालयांजवळ तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत. खासगी बस थांबा शहराबाहेर हलवण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी. ओव्हरलोडिंग आणि रस्ता अतिक्रमणावर त्वरित कठोर कारवाई करावी. तसेच, जिल्ह्यातील मुख्य मार्गावर प्रवाशांसाठी प्रसाधनगृहे उभारण्याची योजना कार्यान्वित करावी.



