बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर रविवारी रात्री सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कारकाटा परिसरात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. या घटनेने वन विभागात खळबळ माजली असून वन्यजीव प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आणि रोष व्यक्त केला जात आहे.
जनसामान्यात ‘बिट्टू’ या नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वाघांपैकी एक मानला जात होता. रेल्वे रुळाजवळ ही घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील टीटीसी सेंटर चंद्रपूर मध्ये हलवण्यात आला.
हा रेल्वेमार्ग घनदाट जंगलातून जात असल्याने या भागात वारंवार वन्यजीवांचे बळी जात आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी रेल्वे प्रशासन तसेच वनविभागावर तीव्र टीका केली जात आहे.या मार्गावर आतापर्यंत १८ वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
जंगलातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवण्याची आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. एका प्रसिद्ध वाघाच्या मृत्यूमुळे या भागात वन्यजीव संवर्धनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



